
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
भैयाजी जोशी यांचे विधान मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठीचा डाव.
मुंबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जगात मुंबई शहराचा मोठा लौकीक आहे. मुंबई ही मराठी लोकांची असून मुंबईची भाषा मराठीच आहे हे सर्वश्रुत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैयाजी जोशी यांचे मराठी भाषेबद्दलचे विधान अत्यंत गंभीर व संतापजनक आहे. भैयाजी जोशी यांनी मुंबई व मराठी भाषेचा अपमान केला असून त्यांची माफी मागावी व सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
“मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे असे नाही, घाटकोपरची भाषा गुजराती आहे,” अशी मुक्ताफळे उधळणाऱ्या संघाच्या भैयाजी जोशी यांच्या विधानाचा समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई व मुंबईचे महत्व काही लोकांना खटकत आले आहे म्हणून जाणीवपूर्वक काही मंडळी व संघटना मुंबईला बदनाम करण्याचे काम करत आहेत. मराठी भाषा ही मुंबईसह महाराष्ट्राची भाषा आहे, त्यामुळे भैयाजी जोशी यांचे विधान हे खोडसाळपणाचे व जाणीवपूर्वक केलेले आहे. आधीच मुंबई एका लाडक्या उद्योगपतीला मोफत विकली जात आहे आता मुंबईच्या भाषेवरही आक्रमण करण्याचा हा कुटील डाव आहे पण तो आम्ही हाणून पाडू.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांचे विधान मराठी भाषेचा व मुंबईकरांचा अपमान करणारे आहे. मुंबई, मराठी भाषेबद्दल भैयाजी जोशी यांनी केलेले विधान तसेच घाटकोपरची भाषा गुजराती आहे म्हणणे हा महाराष्ट्रद्रोह असून मुंबई व मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही. राज्य सरकारने यावर भूमिका जाहीर करावी असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.